गीता महात्म्य आणि गीता अनुसंधान

    श्री वाराहपुराणात गीतेचे माहात्म्य आणि गीता अनुसंधान दिले आहे, आपण सर्व वाचक आणि भक्त श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी वाचत आहोत. तरी परंतु ही मराठीतील सर्वाथाने सखोल म्हणवीली जाणारी गीताच आहे त्यामुळे  ज्ञानेश्वरीच्या वाचनानंतर उपरोक्त गीता माहात्म्य आणि गीता अनुसंधान अवश्य वाचावे.‍ कोणत्याही बदलाशिवाय जसे आहे तसे मराठीत भाषांतर करुन दिले आहे.

     खरतर हा अध्यात्माचा गोड मेवा आहे आपण त्यांची गोडी चाखली तर आणखीन वाढेल. चंदनाच्या संगतीत चंदनाचे काहीतरी गुण हे येतातच. आणि देव शोधावयास गेलो आणि देवची जाहलो अशी एक म्हणही प्रचलित आहे. आपणही हा भक्तीचा मेवा खाऊया. याच्या वाचनाने गीता पाठाचे पुर्ण फळ मिळते.असा शास्त्रात उल्लेख आहे.

श्री गणेशाय नम:

अथ:  गीता माहात्म्य

पृथ्वी सांगते :-  हे भगवान ! हे परमेश्वरा ! प्रारब्धकर्माचा उपभोग घेताना मनुष्याला एकनिष्ठ भक्ती कशा रीतीने करता येईल ? ( १ )

श्रीविष्णू म्हणाले :- प्रारब्धकर्माचा उपभोग घेताना जो मनुष्य अभ्यासात मग्न असतो, तो या लोकांत मुक्त आणि सुखी होतो आणि तोच कर्माने मुल्यांकन केला जात नाही (२)

जसे कमळाच्या पानाला  जळ स्पर्श करु शकत नाही, त्याचप्रमाणे जे गीतेचे ध्यान  करतात, त्याला महापापादि कधीच स्पर्श करु शकत नाहीत. ( ३ )

जिथे गीतेचे पुस्तक ( ग्रंथ ) असेल आणि  जिथे त्याचा पाठ होत असेल तिथे प्रयागादी सर्व तीर्थे असतात. ( ४ )

जिथे गीता असेल तिथे सर्व देव, ऋषी, योगी, नाग आणि गोपाळ त्याचप्रमाणे गोपी आणि नारद, उध्दव त्यांच्या सर्व जोडीदारासह हजर रहातात. ( ५ )

जिथे गीतेचा विचार, शिकणे, शिकवणे, किवां श्रवण होते तिथे हे पृथ्वी! माझी नेहमी वस्ती असते. ( ६)

मी गीतेच्या आश्रयाला राहतो, गीता माझे उत्तम घर आहे आणि गीतेच्या ज्ञानाचा आश्रय करुन मी तिन्ही लोकांचे पालन करतो. ( ७ )

गीता अवर्णनीय पदवाली, अविनाशी, अर्धमात्रा तथा अक्षररुप माझी नित्य, ब्रम्हरुपीनी आणि परमश्रेष्ठ विद्या आहे, यात जरासुध्दा संशय नाही. ( ८ )

शिवाय तो चिदानंद, श्रीकृष्णाने स्वताच्या मुखाने अर्जुनाला सांगितलेली असल्याने परमानंदरुप आणि तत्वरुप पदार्थाच्या ज्ञानाने युक्त आहे. ( ९)

जो मनुष्य स्थिर मनाचा होवुन नित्य गीतेच्या अठरा अध्यायाचा जप करतो, तो ज्ञानरुपी सिध्दी मिळवतो. आणि मग त्याला शेवटी परमपद (मोक्ष‍पद) प्राप्त होते. (१०)

जो कोणी गीतेचा संपुर्ण पाठ करण्यास असमर्थ असेल तर गीतेचा अर्धा पाठ करु शकतो, तरीसुध्दा तो गाईच्या दानाने होणाऱ्या पुण्याईचा लाभ मिळवु शकतो. (११)

जो कोणी गीतेच्या तिसऱ्या भागाचा पाठ करील तो गंगास्नानाचे फळ प्राप्त करतो, आणि सहाव्या भागाचा पाठ करील तर तो सोमयागाचे फळ प्राप्त करतो. (१२)

जो मनुष्य श्रध्दा भक्तीने दररोज एका अध्यायाचा पाठ करतो, तो रुद्रलोक प्राप्त करतो आणि तिथे महादेवाचा गण होवुन दिर्घ काळा पर्यत तेथे रहातो. (१३)

 हे पृथ्वी देवी ! जो मनुष्य नित्य एक अध्याय,एक श्लोक अथवा श्लोकांचा एका चरणाचा परंतु भक्तीपुर्वक पाठ करतो, तो मन्वतंरापर्यत मनुष्यपण प्राप्त करु शकतो. (१४)

जो मनुष्य गीतेचे दहा, सात, पाच, चार, तीन, दोन, एक किवां अर्ध्या श्लोकांचे पाठ करील, तो अवश्य दहा हजार वर्षापर्यत चंद्रलोकांत वास करतो, गीतेचा पाठ पठण करीत मृत्यू पावणारा पापी मनुष्य असेल तर तो सुध्दा मनुष्यपण मिळवतो. (१५,१६)

आणि पुढील जन्मात गीतेचा पुन्हा अभ्यास करुन तो उत्तम गती प्राप्त करतो, गीता अशा उच्चारासहीत मृत्यू पावणारा मनुष्य सदगती मिळवतो. (१७)

गीतेचा अर्थ ऐकण्यास तयार असलेला मनुष्य महापापी असेल तरीसुध्दा तो वैकुंठात जातो आणि भगवान श्री विष्णूदेवां समवेत आनंद प्राप्त करु शकतो. (१८)

 जे अनेक कर्म करुन सुध्दा निष्क्रीय असतात किवां केलेल्या कर्माबद्दल त्यांना कोणतीही आसक्ती नसते, त्यांना जीवनमुक्त समजावे असा मनुष्य  मृत्यू नंतर परमपद म्हणजेच मोक्ष प्राप्त करु शकतो. (१९)

याच गीतेचा आश्रय घेवुन जनक आदी पुष्कळ राजे पापरहीत झाले,आणि पृथ्वीलोकांत यश मिळवले आणि मृर्त्येापरान्तं परमपद म्हणजेच मोक्ष प्राप्त केला. (२०)

जो गीतेचा पाठ करतो परंतु माहात्म्याचा पाठ करीत नाही त्याचा गीतेचा पाठ  निष्फळ जातो आणि अशा प्रकारे गीता  पाठाचे वाचन करणे म्हणजे श्रमरुप म्हटले आहे. (२१)

 या माहात्म्यासहीत गीतेचा जे  श्रध्दा-भक्तीपुर्वक अभ्यास करतात, त्यांना उत्तम फळ मिळते आणि देवांनाही जी गती दुर्लभ आहे ती मिळते. (२२)

आता सुतजी म्हणतात :- गीतेचे हे महान सनातन माहात्म्य मी आपणास समजावुन सांगितले त्याचा गीतेच्या पाठानंतर  शेवटी जो पाठ करतो तो वर सांगितल्याप्रमाणे उत्तम फळ प्राप्त करतो. (२३)

इति श्री वाराहपुराणे श्री गीतामाहात्म्यं संपुर्णम् !

 (या नंतर खालील स्तोत्र वाचावे.)

वाराह पुराणोक्तं गीतामाहात्म्य संधानम्

शौनक म्हणतात  :-  हे सुतजी! अति पुर्व काळातील मुनी श्री व्यासजींनी सांगितलेले तथा श्रुतिमध्ये वर्णन केलेल्याप्रमाणे गीतेचे माहात्म्य मला विस्तारपुर्वक सांगावे. (१)

सुतजी म्हणतात :-  आपण  जे पुरातन आणि उत्तम गीतामाहात्म्य विचारले ते अतिशय गोपनीय आहे त्यामुळे ते सांगण्यास कोणी समर्थ नाही. (२)

गीतामाहात्म्याला संपुर्णपणे तर श्रीकृष्णच जाणतात, काही अंशी अर्जुन जाणतो तथा व्यास, शुकदेव, याज्ञवल्क्य आणि जनक आदी त्याला जाणतात. (३)

दुसऱ्या महापुरुषांनी कानोकानी ऐकुन लोकांना वर्णन करुन सांगितले त्याच रितीने श्रीव्यासजींच्या तोंडुन मी जे ऐकले आहे तेच आज मी आपणासं सांगणार आहे. (४)

 जे आपोआप श्रीविष्णु भगवानांच्या श्रीमुखकमळातुन प्रगट झालेले आहे ते श्री गीताजी चांगल्या रीतीने गाण्यास आणि मनन करण्यास योग्य आहे. दुसऱ्या शास्त्रांच्या संग्रहाचा काय अर्थ ? (५)

गीता धर्ममय आहे,  सर्व ज्ञानानी प्रकाशक त्याचप्रमाणे सर्वशास्त्रमय आहे, म्हणुन गीता सर्व श्रेष्ठ  आहे. (६)

जो मनुष्य हा घोर संसार सागर पार करु इच्छितो तो या गीतामय जहाजावर चढुन या संसारसागरातुन पार पोहचू शकेल. (७)

जो पुरुष या पवित्र गीताशास्त्राचा सावधान होवुन ध्यानपुर्वक पाठ करतो तो भय,शोक,चिंता,क्लेश,व्याधी,दुख: या संसारातील विवंचनातुन मुक्त होवून परमपद (श्रीविष्णूपद) मिळवतो. (८)

गीतेचे ज्ञान ज्यांनी नेहमी अभ्यासपुर्वक ऐकले नाही तरीसुध्दा जो मोक्षाची इच्छा करतो, असा मुढात्मा हा (असा मनुष्य हा)बालकाप्रमाणे हास्यस्पद आहे. (९)

 जे रात्रंदिवस गीताशास्त्राचा अभ्यास करतात अथवा त्याचा नित्य पाठ करतात किवां ऐकतात, त्यांना मनुष्य नव्हे परंतु विना सशंय देवाचाच अशं मानावे.(श्रीकृष्ण भगवान म्हणतात की तो माझेच रुप मानावे.) (१०)

दररोज पाण्याने स्नान केल्याने मनुष्याचा मळ दुर होतो परंतु गीतारुपी मोक्षाच्या ठेव्याच्या पाण्यात एकदाच स्नान केल्याने तो मनुष्य संसाररुपी मळाचा नाश करु शकतो. (११)

जो मनुष्य स्वता गीताशास्त्राचे पाठ-पाठांतर जाणत नाही, तसेच दुसऱ्याकडुनही ज्याने ऐकले नाही तसेच ज्याला त्याचे ज्ञान नाही ज्याची त्याच्यावर श्रध्दाही नाही आणि कोणताही आदर भाव नाही, असा मनुष्य या लोकात भटकणाऱ्या डुकरासारखाच असतो. जो गीता जाणत नाही त्याच्यापेक्षा नीच मनुष्य या जगात दुसरा कोणी नाही.( १२,१३)

जो गीता वाचतो, परंतु गीतेच्या पाठाचे अर्थपुर्वक मनन करत नाही किवां आचरण करत नाही, त्याच्या बाहयज्ञानाच्या देखाव्याचा, यशाचा धिक्कार असो. यापेक्षा अधर्मी दुसरा कोणी मनुष्य नाही.( १४ )

एवढच नव्हे तर जे ज्ञान गीतेत वर्णन केलेले नाही, ते ज्ञान वेद आणि वेदान्तांत पण निष्फळ धर्मरहीत आणि असुरी समजावे.  (१५ )

जो मनुष्य रात्रंदिवस, झोपता, जागता, उठता,बसता, चालता-बोलता, गीतेचे ध्यानपुर्वक अध्ययन, श्रवण, मनन करतो तो मनुष्य शाश्वत मोक्षाचा अधिकारी बनतो. (१६ )

योगीजनाच्या स्थानात, सिध्दांच्या स्थानात, श्रेष्ठ पुरुषासमोर संताच्या सभेत यज्ञस्थळी अथवा श्रीविष्णू भक्तांसमोर गीतेचा पाठ करणारा मनुष्य अवश्य परमगती मिळवतो अर्थात मोक्षाचा अधिकारी होतो.  (१७)

जो मनुष्य दररोज गीतेचा पाठ करतो अथवा गीता पाठ श्रवण करतो, अशा मनुष्याला दक्षिणेसहीत अश्वमेधादी यज्ञाचे फळ मिळते.  (१८)

जे भक्तीभावाने एकाग्रचित्ताने गीतेचे अध्ययन करतात त्यांनी सर्व वेद, शास्त्रे आणि पुरांणाचा अभ्यास केला आहे असे समजावे. (१९)

जो मनुष्य स्वता गीतेचा अर्थ ऐकतो, त्याप्रमाणे आपले आचरण करतो आणि परोपकरासाठी आपणास मिळालेले ज्ञान दुसऱ्यास ऐकवतो तो निशंक मोक्षाचा अधिकारी होतो. (२०)

ज्या घरात  श्री गीताचीचे पुजन होते तिथे तिन्ही प्रकारचे अर्थात आधिदैहिक, आधिदैविक आणि अधिभौतिक  पीडा तथा व्याधींचे  कधीही भय रहात नाही. (२१ )

तसेच अशा घरातील मनुष्याला कोणाचाही शाप किवां पाप लागत नाही, त्यांची जीवनात दुर्गती होत नाही, आणि त्याला शरीराचे सहा शत्रु काम, क्रोध, लोभ,  मोह, मद, मत्सर हे कधी दुख:  देत नाही. (२२)

जिथे निरंतर गीतेचा आनंद प्रवर्तित होत आहे, तिथे श्रीभगवान परमेश्वरात अनन्य भक्ती निर्माण होते. (२३ )

स्नान केले असो वा नसो, पवित्र असो वा नसो परंतु जे निर्मळ मनाने  परमात्मा विभुतीचे आणि त्यांच्या विश्वरुपाचे  नित्य स्मरण करतात ते सर्वदा पवित्रच असतात. (२४ )

सर्वत्र भोजन करणारा आणि सर्व प्रकारचे दान घेणारा मनुष्य, जो गीतापाठ करतो तो त्याच्या पापाने लेपला जात नाही. (२५ )

ज्या मनुष्याचे चित्तच सदा गीतेतच लीन असते, असा मनुष्य  संपुर्ण अग्नीहोत्री, सदा जप करणारा, क्रियावान तथा पंडिता समान आहे.  (२६ )

असा मनुष्य दर्शन करण्यास योग्य आणि तो ज्ञानाने संपत्तीवान, योगी, ज्ञानी, याज्ञिक, ध्यानी तथा सर्व वेदांचा अर्थ जाणणारा समजावे. (२७ )

जिथे गीता (ग्रंथाचा) पुस्तकाचा नित्य पाठ असतो, तिथे पृथ्वीवरील प्रयागादी सर्व  तीर्थे वास करतात. (२८ )

ज्या घरात गीतापाठ होत असतात त्या घरात आणि देहरुपी नगरात सर्व देव,ऋषी, योगी आणि सर्व नेहमी वास करतात. (२९ )

गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रम्हविद्या, ब्रम्हवल्ली, त्रिसंध्या, मुक्त गेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवघ्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता आणि तत्वर्थज्ञान मंजरी अशा गीतेच्या अठरा नावांनी जो मनुष्य नित्य श्रध्दापुर्वक जप करतो तो लवकर ज्ञानसिध्दी प्राप्त करतो. आणि शेवटी परमपद प्राप्त करतो. (३०,३१,३२ )

मनुष्य जे जे कर्म करतो त्या सर्वात गीतापाठ चालू ठेवावा त्यामुळे ते कर्म निर्दोष रीतीने समाप्त होते आणि त्याचे पुर्ण फळ मिळते. (३३ )

जो मनुष्‍य श्राध्दातं पितरांना उद्देशुन गीतापाठ करतात त्यांचे पितर अति संतुष्ट होतात आणि नरकात असतील तर सदगती मिळवतात. (३४ )

गीतापाठाने प्रसन्न झालेले त्याचप्रमाणे श्राध्दाने तृप्त झालेले ते पितर पुत्रांना आर्शिवाद देतात व पितृलोकांत जातात. (३५ )

जो मनुष्य श्रध्देने गीता लिहुन गळयात, हातात, किवां मस्तकावर धारण करतो, त्यांची सर्व विघ्ने आणि दारुण उपद्रव लगेचच नाश पावतात. (३६ )

भरतखंडात चार वर्णामधुन कोणत्याही वर्णात मनुष्य देह मिळवुन जो मनुष्य अमृतस्वरुप गीता ऐकतो किवां शिकत नाही, तो मनुष्‍य हातात आलेले अमृत त्यागुन दुखरुपी विष मिळवतो असे समजावे, जे गीतारुपी अमृताचे सेवन करतात ते मोक्ष मिळुन सुखी होतात. (३७,३८ )

संसाराच्या दुखाने पिडलेले जी माणसे गीतेचे ज्ञान ऐकतात, ती गीतारुपी अमृताचेच सेवन करतात, अशी माणसे सुख मिळुन श्रीहरीच्या धामाला पोहाचतात. (३९)

या लोकांत पुष्कळ राजांनी जनकआदी राजाप्रमाणे गीतेचा आश्रय घेवुन पापरहीत होवुन परमपद प्राप्त करतात. (४०)

भगवान श्रीकृष्णांनी स्वता सांगितलेली गीता म्हणजे सर्व वेद,वेदांत, शास्त्रे, पुराणे आदिचे सार आहे, मनुष्य जीवनातील अतिउच्च अशी अध्यात्माची पातळी आहे, परंतु या गीतेमध्ये कोणीही उच्च-नीच आहे असा गीता कधीही भेदभाव करत नाही.ती ब्रम्हस्वरुप आहे, ती भगवान श्रीकृष्णांचा आत्मा आहे. गीतेचे ज्ञान हे सर्वासाठी एकसारखे आहे. (४१)

 गीतेचा अर्थ परम श्रध्देने ऐकुनही ज्याला आनंद मिळत नाही तो मनुष्य आळसामुळे या लोंकात गीता श्रवणाचे फळ मिळवु शकत नाही, परंतु व्यर्थच  श्रम करतो. (४२)

गीतेचा पाठ करुन जो मनुष्य गीतेच्या माहात्म्याचाा पाठ करत नाही, त्याच्या गीतापाठाचे फळ हे व्यर्थच जाते आणि असा मनुष्य केवळ कष्टच किवां मेहनतच करतो. (४३ )

या माहात्म्यासहीत जो मनुष्य गीतापाठ करतो त्याचप्रमाणे श्रध्देन ते एैकतो, तो देवदुर्लभ अशी गती मिळवतो आणि परम मोक्षाचा अधिकारी होतो. (४४ )

गीतेचे हे सनातन माहात्म्य मी सांगितले आहे त्याचा गीतेच्या पाठाच्या अंतीच जे पुरुष पाठ करतात ते वर सांगितले आहे ते फळ अवश्य मिळवतात. (४५)

इति श्रीवाराहपुराणोक्तं गीतामाहात्म्यनुसंधानं समाप्तम् !